Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
मराठी भाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील एक भाषा आहे. मराठी ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, भारतात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे ९ कोटी आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे. मराठी भाषा भारताच्या प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे. मराठीचे वय सुमारे २२०० वर्ष आहे. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून मराठी भाषेला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भर पडत आहे.
मराठी भाषिक प्रदेश
मराठी भाषा मुख्यत्वे भारताच्या महाराष्ट्र राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर गोवा, उत्तर कर्नाटक (बेळगांव, हुबळी-धारवाड, गुलबर्गा, बिदर, कारवार), गुजरात (दक्षिण गुजरात, सुरत, बडोदा व अहमदाबाद), आंध्रप्रदेश (हैदराबाद), मध्यप्रदेश (इंदूर, ग्वाल्हेर), तामिळनाडू (तंजावर) व छत्तीसगढ राज्यांत आणि दमण आणि दीव, दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांतील काही भागातही मराठी बोलली जाते. देशातील 09 राज्ये,4 केंदेशशित प्रदेश आणि ७२ देशांमध्ये मराठी भाषिकांची वस्ती आहे. इतरही अनेक देशांमध्ये मराठी भाषा बोलण्याचे प्रमाण वाढत आहे.
मराठी भाषा भारतासह, फिजी, मॉरिशस व इस्रायल या देशांतही बोलली जाते.[२] त्याचबरोबर जगभरात विखुरलेल्या मराठी-भाषकांमुळे मराठी अमेरिकेची संयुक्त संस्थाने, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंड येथेही बोलली जाते.[३]
राजभाषा
भारतीय राज्यघटनेतील २२ अधिकृत भाषांच्या यादीत मराठीचा समावेश आहे. मराठी ही महाराष्ट्र राज्याची एकमेव अधिकृत राजभाषा आहे. गोवा राज्यात कायद्यानुसार कोकणी ही राजभाषा असली तरी मराठीचा वापर शासनाच्या सर्व कारणासाठी होऊ शकतो. शासनाशी मराठीत होणाऱ्या पत्रव्यवहाराचे उत्तर मराठीतच दिले जाते. दादरा व नगर हवेली[४] या केंद्रशासित प्रदेशात मराठी एक अधिकृत राजभाषा आहे.
महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांत मराठीच्या उच्च शिक्षणाची सोय आहे तसेच महाराष्ट्राबाहेरील गोवा विद्यापीठ (पणजी)[५], महाराजा सयाजीराव विद्यापीठ (बडोदे)[६], उस्मानिया विद्यापीठ (तेलंगण), गुलबर्गा विद्यापीठ[७], देवी अहिल्या विद्यापीठ (इंदूर)[८] व जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय (नवी दिल्ली)[९] येथे मराठी उच्चशिक्षण विभाग आहेत. महाराष्ट्राबाहेरील एकूण १५ विद्यापीठांमध्ये मराठी शिकविली जाते.
प्रमाणभाषा
प्रमाणभाषा ही एक बोली भाषाच असते. तथापि त्याचे नियम पक्के बांधलेले आणि मान्यताप्राप्त असतात. यामुळे सर्वत्र एकाच प्रकारचे लेखन केले जाते आणि त्यामुळे भाषा वाढीस त्याचा उपयोग होतो. यास मानक भाषा अथवा प्रमाण भाषा असेही म्हंटले जाते. भाषेचे मानकीकरण ही एक निरंतर प्रक्रिया आहे. भाषा प्रमाणीकरण प्रक्रिया स्थिर करण्यासाठी प्रयत्न केले जावे लागतात. मानक भाषा हा समाजात वापरल्या जाणाऱ्या बोलल्या जाणाऱ्या आणि लिखित संप्रेषणांमध्ये व्यापकपणे ओळखल्या जाणाऱ्या परंपरांचा संग्रह असतो. मराठी साहित्य महामंडळाने पाठवलेल्या लेखनविषयक नियमांची यादी इ.स. १९७२ मध्ये महाराष्ट्र शासनाने मान्य केली. त्यात आणखी चार नियमांची भर घालण्यात आली. महाराष्ट्र शासनाने ते नियम मान्य करून मराठी प्रमाणभाषेचे लेखन या नियमांनुसार करावे आणि ते त्वरित अंमलात आणावेत, असा शासकीय आदेश काढला आहे. मराठी भाषेमध्ये त्या नियमांनुसार मानक भाषा मराठीचे लेखन केले जाते.[१०] औपचारिक लेखन करतांना मराठी प्रमाणभाषा वापरली जाते. औपचारिक व ग्रांथिक लेखनासाठी सर्वमान्य अशी प्रमाणभूत मराठी भाषा असणे आवश्यक असते. औपचारिक लेखन म्हणजे वैचारिक, वैज्ञानिक, शास्त्रीय लेखन, ललितेतर साहित्य, रस्त्यावरच्या सूचना फलक, वर्तमानपत्र बातम्या, संपादकीय, मासिकातील लेख, शासकीय पत्रव्यवहार इत्यादी लेखनात प्रमाणभाषेचाच वापर करणे आवश्यक आहे.[११] याशिवाय व्याख्याने आणि परिसंवादांमध्ये प्रमाणभाषेचाच वापर केला गेला जातो. प्रमाण भाषा म्हणजे एकसारखी भाषा वापरल्याने भाषेला स्थिरता येते.
प्रमाणभाषा महत्त्व आणि उपयोग
एका प्रकारे लिहिलेल्या भाषेला संगणकीकृत शोध घेतांना प्रमाणभाषा वापरलेली असेल तर त्याचा उपयोग होतो आणि योग्य ते लेखन सर्च इंजिनास सापडते. अन्यथा प्रत्येक वेळी निराळा शोध देत बसावे लागेल आणि इतके करूनही सर्व माहिती मिळाली असे म्हणता येणार नाही. तसेच कायदे विषयक लेखन करतांना एकाच प्रकारच्या भाषेमध्ये करणे आवश्यक आहे. अन्यथा कायद्याचा अर्थ लावणे अशक्य होईल. याच प्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात कोणतेही निदान करणे अवघड होईल. कारण एकाच रोगासाठी डॉक्टर अनेक शद्ब वापरू लागले तर रुग्णास नक्की काय होते आहे याचे निदान करून त्याची औषधे मिळवणे शक्य होणार नाही. यामुळे मानक भाषेचा वापर करणे अतिशय आवश्यक आहे. एकच भाषा वापरल्याने सामायिक मराठी संस्कृती स्थापित होते आणि आम्ही मराठी आहोत असे म्हणत येते. असा भाषेचा उपयोग चीन मध्ये झालेला दिसून येतो. चीन मध्ये अनेक बोली भाषा होत्या पण एकच प्रमाणित चीनी भाषा ही मानक भाषा म्हणून लागू केल्याने सर्व चीनी लोक एकमेकांशी जोडले गेले आहेत. तसेच इस्राएल देशा मध्ये हिब्रू भाषा संवर्धनात मानक भाषा वापरल्याने हिब्रू भाषा समर्थ झाली आणि आज एकेकाळी मृत झालेलेल्या भाषेत आज शास्त्रीय संशोधने प्रकाशित होत आहेत. याच प्रमाणे मराठी भाषेत लेखन करतांना अथवा संशोधन निबंध प्रकाशित करण्यासाठी व्याकरणाचे शासकीय नियम असलेली मराठी भाषा वापरणे आवश्यक आहे.
मराठी भाषा दिवस
१ मे हा दिवस महाराष्ट्र दिन किंवा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. याखेरीज विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.