Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते. ते पंडित नेहरू या नावानेही ओळखले जातात. पंडित नेहरूंना मुले फार आवडत, म्हणून मुले त्यांना चाचा नेहरू म्हणायचे.
श्री जवाहरलाल नेहरू यांचा जन्म अलाहाबाद येथे काश्मिरी पंडितांच्या घरी नोव्हेंबर १४, इ.स. १८८९ रोजी झाला. फेब्रुवारी ७, इ.स. १९१६ रोजी वयाच्या २६ व्या वर्षी त्यांचा विवाह कमला कौल यांच्याशी झाला. इ.स. १९१७ साली त्यांना इंदिरा प्रियदर्शिनी ही कन्या झाली. जवाहरलाल यांचे पिता मोतीलाल नेहरू यांचे फेब्रुवारी ६, इ.स. १९३१ रोजी व पत्नी श्रीमती कमला नेहरू यांचे फेब्रुवारी २८, इ.स. १९३६ रोजी निधन झाले.
राजकीय आयुष्य :
जवाहरलाल नेहरू यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच खाजगी शिकवण्यांद्वारे झाले. वयाच्या १५ व्या वर्षी ते इंग्लंडला आणि त्यानंतर दोन वर्षे ते हॅरो येथे शिक्षणाकरिता गेले. केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी सामान्य विज्ञान (नॅचरल सायन्स) या विषयात पदवी घेतली. ते १९१२ साली भारतात परतले आणि सरळ राजकारणात उतरले.
१९१२ मध्ये झालेल्या बंकीपूर काँग्रेस अधिवेशनाला ते उपस्थित होते. १९१९ मध्ये ते होमरुल चळवळीचे अलाहाबादचे अध्यक्ष बनले. १९१६ मध्ये ते प्रथमच महात्मा गांधींना भेटले आणि त्यांच्यापासून विलक्षण प्रेरित झाले. १९२० साली त्यांनी उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यात पहिला किसान मोर्चा काढला. १९२०-२२ दरम्यान असहकार आंदोलनामुळे त्यांना दोनदा कारावास भोगावा लागला.
सप्टेंबर १९२३ मध्ये पंडित नेहरू अखिल भारतीय काँग्रेस परिषदेचे सचिव बनले. १९२६ मध्ये त्यांनी इटली, स्वित्झर्लंड, इंग्लंड, बेल्जियम, जर्मनी आणि रशिया आदी देशांचा दौरा केला. १९२८ मध्ये सायमन कमिशन विरोधात निदर्शने करताना त्यांना लाठी हल्ल्याला सामोरे जावे लागले. त्याच वर्षी झालेल्या सर्वपक्षीय काँग्रेस सभेला ते उपस्थित होते. १९२८ मध्येच त्यांनी स्वतंत्र भारत चळवळ सुरू केली. १९२९ साली पंडित नेहरू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. तेथे संपूर्ण स्वातंत्र्य हेच ध्येय निश्चित केले गेले.
ब्रिटीश सरकारने भारत कायद्याचा ठराव संमत केला तेव्हा काँग्रेसने निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीच्या बाहेर असताना नेहरूंनी पक्षाला पाठिंबा दर्शविला. काँग्रेसने प्रत्येक राज्यात सरकार स्थापन केले आणि बहुतेक जागा जिंकल्या. 1936-1937 मध्ये नेहरू काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेले.
काँग्रेसचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी देशभर दौरा काढला. अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसच्याही अध्यक्षपदी ते निवडून आले आणि त्यांचा भारतातील संघटित कामगार चळवळींशी जवळचा संबंध आला.
१९३० ते १९३५ दरम्यान मिठाचा सत्याग्रह आणि अशाच अन्य सत्याग्रहांमुळे नेहरूंना अनेकदा कारावास भोगावा लागला. १४ फेब्रुवारी, १९३५ रोजी त्यांनी उत्तराखंडमधील अल्मोडा तुरूंगामध्ये आपले आत्मचरित्र पूर्ण केले. सुटकेनंतर ते स्वित्झर्लंड, इंग्लड, स्पेन आणि चीन येथे जाऊन आले. ७ ऑगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात त्यांनी भारत छोडो ही क्रांतीकारी घोषणा केली आणि पुढच्याच दिवशी त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि त्यांना अहमदनगर किल्ल्यात नेण्यात आले. ही त्यांची कैद ही सर्वांत दीर्घकालीन पण शेवटची ठरली. एकंदर पंडित नेहरूंनी ९ वेळा कारावास भोगला. १९४५ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. १९४६ मध्ये ते आग्नेय आशियाला जाऊन आले. त्यानंतर ६ जुलै, १९४६ रोजी त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. १९५४ पर्यंत त्यांनी पदभार सांभाळला.
सन्मान :
२०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये नेहरू चौथ्या क्रमांकावर होते.