नागरी समुदाय म्हणजे काय?www.marathihelp.com

नागरी समाज : नगरे किंवा उपनगरे यांत रहात असलेला समाज हा नागरी समाज होय. समाजातील बहुसंख्य लोक उपजीविकेसाठी बिगरशेती अगर बिगरप्राथमिक व्यवसायांवर अवलंबून असणे, समाजाची लोकसंख्या मोठी असणे आणि लोकवस्तीची दाटी अधिक असणे, ही तिन्ही वैशिष्ट्ये एकत्रित असल्यास त्याला नागरी समाज म्हणता येईल. यांतील एखादेच वैशिष्ट्य दिसून आले, तर त्याला नागरी समाज म्हणता येणार नाही.

उपभोग्य वस्तूंची प्राप्ती नैसर्गिक रीतीने करून घेणे अगर बिनकसबी मजुरीतून सेवा उपलब्ध करून देणे, हे प्राथमिक व्यवसाय होत. शेती, खाणकाम, गुरे चारणे, मेंढ्या हाकणे, जंगलातून काटक्याकुटक्या, डिंक, मध गोळा करणे इ. हेही प्राथमिक व्यवसाय होत. या कामांचे स्वरूपच असे आहे, की त्यांतील माणसांच्या मानाने कामाची जागा मोठी असते. ग्रामीण समाजात अशा व्यवसायांवर अवलंबून असलेल्यांची संख्या अधिक असते. बिगरप्राथमिक व्यवसायांमध्ये यंत्रोपकरणे, हत्यारे यांच्या साह्याने बुद्धिकौशल्य अगर कारागिरी वापरून उपभोग्य वस्तूंचे उत्पादन करणे अगर सेवास्वरूपी कामे करणे, हे प्रकार येतात. भिन्नभिन्न क्षेत्रांतील व्यवस्थापनाचा व्यवहार सांभाळणारा अधिकारी वर्ग, प्रत्यक्ष उत्पादनात गुंतलेले लोक आणि अनेक तऱ्हेची सेवा करणारे लोक यांत येतात. नगरांमध्ये अशा लोकांची संख्या अधिक असते. यांच्या कार्याच्या मानाने त्यांना दैनंदिन व्यवहारांकरिता जागा कमी लागते. ग्रामीण आणि नागरी व्यवसायांमधला हा फरक सर्वकालीन नागरी समाजांच्या संदर्भात दिसून येतो; परंतु औद्योगिकीकरणपूर्व नागरी समाजात वस्तूंचे उत्पादन हे बव्हंशी अगर संपूर्णतया माणसांच्या हस्तकौशल्यावर अगर अंगमेहनतीवर अवलंबून असे. बैल, घोडा अशा जनावरांचा उपयोग जरी करून घेतला, तरी त्यांबरोबर माणसांनाही खपावे लागत असे.

उत्पादक साधने किंवा हत्यारे ही माणसांनी प्रत्यक्ष हाताळावी अशीच होती आणि त्यांकरिता खास प्रशिक्षणाची आवश्यकताही फारशी नव्हती. औद्योगिकीकरणानंतर उत्पादक व सेवात्मक साधने ही अधिकतर यांत्रिक बनली. यंत्रोपकरणे हाताळण्याकरिता प्रत्यक्ष मनुष्यबळाची आवश्यकता न लागता, यांत्रिक प्रक्रिया ही अधिकाधिक वायू, वाफ, वीज व अणुशक्ती अशा अचेतन शक्तींवर अवलंबून राहिली. प्राचीन व आधुनिक नागरी समाजांमधला हा महत्त्वाचा फरक होय. नागरी समाजाचे वैशिष्ट्य हे केवळ अप्राथमिक अगर बिगरशेती व्यवसायांवर अवलंबून असलेले लोक बहुसंख्य असण्यावर अवलंबून नाही. उदा., रहदारीच्या मार्गांवर असलेली दुकाने, उपाहारगृहे, पेट्रोलपंप इत्यादींच्या छोट्या समूहाला नागरी समाज म्हणता येत नाही. त्यांच्या संख्यांत भर पडून समूह मोठा झाला आणि दैनंदिन व्यवहारांतील स्वायत्तता अगर स्वयंपूर्णता त्याला लाभली, की तो नागरी समाज बनतो. म्हणून अप्राथमिक व्यवसायांच्या आधिक्याबरोबरच अधिक लोकसंख्येची पण आवश्यकता असते.

लोकसंख्या अधिक आहे ह्या एकाच निकषावरही कोणताही समाज नागरी समाज ठरू शकत नाही. अदमासे ५,००० वस्तीच्या समूहाला शहर (टाउन) म्हणावे, असे जनगणनेने स्वीकारले आहे. एक लाख वस्तीच्या समूहाला नगर (सिटी), दहा लाख वस्तीच्या समूहाला महानगर (मेट्रोपलिस) आणि सर्वसाधारणपणे पन्नास लाखांपेक्षा अधिक वस्ती असलेल्या समूहाला प्रचंड नगर (मेगॅलोपलिस) असे म्हटले जाते. परंतु ५,००० वस्तीच्या सर्वच समूहांना शहर म्हणता येणार नाही. भारतात आंध्र प्रदेशामधील काही गावांची लोकसंख्या ५,००० हून अधिक असलेली दिसून आलेली आहे. त्याचप्रमाणे काही उपनगरांतील लोकसंख्या ५,००० पेक्षा कमी असलेली उदाहरणे आहेत. म्हणून लोकसंख्येबरोबरच लोकांचा व्यवसायही लक्षात घेणे आवश्यक आहे.

नगर हे त्याच्या संपर्कात येणाऱ्या भोवतालच्या प्रदेशातील लोकांच्या गरजा भागविण्याकरिता अस्तित्वात आलेले मध्यवर्ती ठिकाण होय. त्यातील लोकसंख्या ही त्याच्याशी व्यावहारिक संपर्कात येणाऱ्या भोवतालच्या प्रदेशाच्या व्याप्तीवर अवलंबून असते. संपर्काच्या साधनांची विपुलता, तसेच वेग व खर्च या दृष्टीनी त्यांची कार्यक्षमता, यांवर नगराशी संबंधित असणाऱ्या भोवतालच्या प्रदेशाची व्याप्ती अवलंबून असते. भोवतालच्या प्रदेशाच्या गरजांची संख्या व स्वरूपावरून नगरातील व्यवसायांची संख्या व स्वरूप ठरते. गरजा आणि नागरी व्यवसायांमधील विविधता ही, नगरात उपलब्ध होऊ शकणारी निसर्गनिर्मित संपत्ती व तिचा वापर करण्याकरिता आवश्यक असलेले ज्ञान, बुद्धिकौशल्य, कारागिरी, हत्यारे व अवजारे ह्या साधनसामग्रीवर अवलंबून असते. अर्थातच यंत्र-तंत्राच्या विकासाने औद्योगिकीकरण झाले, म्हणजे उत्पादन झपाट्याने मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. उत्पादन मोठ्या प्रमाणावर करणे हेच किफायतशीर ठरते. कोणतेही काम मोठ्या प्रमाणावर करणे हेच किफायतशीर ठरते.

कोणतेही काम मोठ्या प्रमाणावर होऊ लागले, की एकूण कामाचे आटोपशीर भाग पाडून स्वतंत्र व्यक्तीकडे अगर एखाद्या तुकडीकडे ते काम सोपविणे आवश्यक ठरते. अशा सर्व विभागांतील कामांत सुसूत्रता आणण्याकरिता नोकरशाही अस्तित्वात येते. यंत्र-तंत्रांच्या विकासामुळे कामाचा व्याप वाढतो, एवढेच नव्हे, तर एकूण कामाची जी विभागणी केली जाते, ती यांत्रिक प्रक्रियेच्या आणि त्याकरिता लागणारे खास बुद्धिकौशल्य अगर कसब यांच्या भिन्नतेनुसार असते. हे बुद्धिकौशल्य अगर कसब कौटुंबिक परंपरेतून उपलब्ध होणारे नसून प्रशिक्षणाने मिळवावयाचे असते आणि हे प्रशिक्षणही कुटुंबाच्या आवाक्याबाहेरचे असून प्रत्येक व्यक्तीला आपल्या इच्छेनुसार आणि आपल्या कुवतीनुसार ते स्वतंत्र प्रशिक्षण-केंद्रातून घ्यावे लागते. आधुनिक नागरी समाजातील औद्योगिक उत्पादनाच्या व सेवाकार्याच्या केंद्रांना लागणारा कर्मचारीवर्ग व अधिकारीवर्ग हा, म्हणूनच त्यांच्या प्रशिक्षणानुसार व त्यायोगे सिद्ध झालेल्या पात्रतेनुसार नेमलेला असतो. धर्म, प्रदेश, भाषा इ, बव्हंशी जन्मजात व पात्रतानिरपेक्ष भेदांनुसार कर्मचारीवर्ग नेमणे औद्योगिक व व्यावहारिक कार्यक्षमतेच्या दृष्टीने शक्यच नसते. म्हणून नागरी समाज हा आकाराने मोठा असतो, एवढेच नव्हे, तर त्यातील लोकांत सांस्कृतिक दृष्टिने बहुजिनसीपणा अगर बहुविधता असते.

लोकांमधील हा भेद आधुनिक नगरांत अधिक दिसून येतो. नगरांच्या संपर्कात येणाऱ्या प्रदेशाच्या व लोकांच्या विविधतेवर ही विविधता अवलंबून असते. आधुनिक यंत्र-तंत्राच्या विकासाने नगरांच्या संपर्कात येणाऱ्या प्रदेशाचा विस्तारही वाढला आहे. तरीही भिन्नभिन्न नगरांच्या संपर्कात अगर वर्चस्वाखाली येणाऱ्या प्रदेशावरून नगरांची प्रादेशकि केंद्रे, विभागीय केंद्रे, जिल्हा केंद्रे, राज्य केंद्र, राष्ट्रीय केंद्र, आंतरराष्ट्रीय केंद्र अशी विभागणी करता येते. प्रादेशिक केंद्रापेक्षा राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय केंद्रांत लोकसंख्या व त्यांची सांस्कृतिक विविधता ही अधिकाधिक असणे स्वाभाविक आहे.

नागरी समाजाचे तिसरे वैशिष्ट्य लोकवस्तीची दाटी. ही त्यातील व्यवसायांचे स्वरूप व व्यवसायांच्या प्रमुख कार्याला लागणारी कमी जागा यांमुळे ग्रामीण वस्तीपेक्षा मुळातच अधिक असणे स्वाभाविक आहे. यंत्र-तंत्रांच्या विकासानंतर कमीत कमी जागेत अवजड यंत्रे बसवून अधिकाधिक कर्मचाऱ्यांना कामात गुंतविणे शक्य झाल्यामुळे जागेचे महत्त्व वाढले आणि वस्तीचे केंद्रीकरण होऊ लागले. म्हणून आधुनिक नगरांतील वस्ती ही औद्योगिकीकरणपूर्व नगरांतील वस्तीपेक्षा अधिक दाट असल्याचे दिसून येते. परंतु दाट वस्ती ही केवळ नागरी समाजाचेच वैशिष्ट्य होऊ शकत नाही. समृद्ध अगर बागायती शेतीवर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातील वस्तीही काही ठिकाणी नागरी समाजाइतकीच दाट असलेली दिसून येते. भारतातील सुंदरबनासारख्या समृद्ध प्रदेशातील वस्ती याचे उदाहरण म्हणून सांगता येईल. नागरी समाज हा भोवतालच्या प्रदेशाच्या गरजा भागविण्याकरिता मध्यवर्ती ठिकाणी निर्माण झालेले केंद्र जरी असले, तरी सर्वच गरजा या एकाच केंद्रातून भागविल्या जातातच, असे नव्हे. ऐतिहासिक परंपरेनुसार अगर दळणवणाच्या सोयीसवलती व लोकांच्या आवडीनिवडींनुसार विशिष्ट गरजा भागविण्याकरिता विशिष्ट नागरी केंद्रेही अस्तित्वात येतात. एका केंद्रावर भोवतालच्या प्रदेशाचा भार प्रमाणाबाहेर वाढला, तर त्याचा भार हलका करण्याकरिता एखादे उपकेंद्र अस्तित्वात येते. नागरी केंद्राकडून भागविल्या जाणाऱ्या प्रमुख गरजांनुसार नगरांचे कार्यात्मक वर्गीकरण करता येते. शासकीय केंद्र, दळणवळणाचे केंद्र, औद्योगिक केंद्र त्याचप्रमाणे शैक्षणिक, आरोग्यविषयक, व्यापारविषयक, यात्राविषयक, सैनिकी इ. भिन्नभिन्न नागरी केंद्रे असू शकतात. या प्रत्येक केंद्रात एका विशिष्ट कार्याभोवती त्या विशिष्ट कार्याला पूरक असलेल्या इतर अनेक व्यवसायांची गुंफण झालेली दिसून येते. केंद्रातील प्रमुख कार्य वा व्यवसाय कोणताही असला, तरी काही मूलभूत गरजा भागविणारी दुकाने, करमणुकीची साधने, शाळा व छोटेमोठे स्वतंत्र व्यावसायिक हे सर्वत्र दिसून येतात.

नागरी समाज उदयास येण्याकरिता पूरक ठरणाऱ्या गोष्टींमध्ये भरपूर पाणीपुरवठा हा सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. मानवी वसाहत मुळात नदीकाठी अगर तळ्याशेजारी जेथे पाण्याचा पुरवठा अनिर्बंधपणे होऊ शकेल, अशाच ठिकाणी प्रथम सुरू झाली. पुरातन संस्कृतीचा उगम व विकासही नाईल, युफ्रेटीस, टायग्रिस, सिंधू, गंगा, यमुना अशा बारमाही नद्यांच्या परिसरातच झाला. साहजिकच पुरातन आणि औद्योगिकीकरणपूर्व नगरेही पाणीपुरवठा अधिक व अव्याहत असेल, अशाच ठिकाणी वसविलेली दिसून येतात. पाणीपुरवठ्याच्या खालोखाल वाहतुकीची व दळणवळणाची साधने ही महत्त्वाची मानली जातात. अनेक नगरे दळणवळणाच्या अगर रहदारीच्या संगमावर उदयास आलेली आहेत. वाहतुकीची आणि दळणवळणाची साधने जितकी जलद गतीची आणि कार्यक्षम असतील, तितका नगराचा भोवतालच्या अधिकाधिक प्रदेशाशी संपर्क-संबंध येणे शक्य होते व नगराचा आकार मोठा होत जातो. नागरी समाजाचा आकार जसा मोठा होईल, त्या प्रमाणात नागरी लोकसंख्येला पुरेल इतके अतिरिक्त धान्याचे उत्पादन ग्रामीण भागातून व्हावयास हवे. शेतीव्यवसायाचे यांत्रिकीकरण होऊन अगर अन्य कारणांनी ग्रामीण भागातील व्यवसाय उपजीविकेचे साधन बनण्यास असमर्थ ठरू लागले, की ग्रामीण भागातील अतिरिक्त लोक कामधंदा शोधण्याकरिता छोट्या-मोठ्या नगरांकडे धाव घेऊ लागतात. त्याचप्रमाणे यांत्रिकीकरणामुळे वा अन्य कारणांनी नगरांतील व्यवसायांकरिता अधिकाधिक प्रशिक्षित किंवा अशिक्षित कर्मचारी ग्रामीण व छोट्या शहरांतून खेचले जातात. नागरी भागांत अशा प्रकारे बाहेरील लोकांना खेचण्याची व ग्रामीण भागांत लोकांना बाहेर घालविण्याची प्रक्रिया सतत चालू असते. नागरी भागांतील मागणी आणि ग्रामीण भागांतील अतिरिक्त मजूरकारागीर-वर्ग यांनुसार ही प्रक्रिया चालते. दळणवळणाच्या व रहदारी मार्गांच्या जाळ्याच्या केंद्रस्थानी असलेल्या नगराची वाढ झापाट्याने होते. अशा केंद्रस्थानी औद्योगिक, शैक्षणिक, शासकीय, सांस्कृतिक व इतर सामाजिक व्यवहारांची केंद्रेही आकर्षिली जातात. पाणीपुरवठा, वाहतूक व दळणवळणाची सोय या मुख्य गोष्टींबरोबरच शासकीय संपर्काची सोय, पतपेढ्या, व्यापारी उलाढालींकरिता आवश्यक असलेली बाजारपेठ, कच्च्या मालाचा तसेच प्रशिक्षित व इतर मनुष्यबळाचा पुरवठा, उत्पादित वस्तू व संघटित सेवाकार्ये यांकरिता पुरेशी मागणी यांवर नगरांचे अस्तित्व व वाढ अवलंबून असते. आधुनिक नगरांकरिता विजेची व तत्सम शक्तींची आवश्यकता असते. आधुनिक औद्योगिक आणि नागरी केंद्रांमध्ये अशा शक्तींच्या आधारे चालणाऱ्या अवजड यंत्रांच्या साहाय्याने विविध वस्तूंचे उत्पादन केले जाते, तसेच सेवा कार्यांची निर्मिती व वितरण केले जाते. उत्पादनक्षेत्रात या अवजड यंत्रांचा प्रवेश झाल्यामुळे आणि या यंत्रांची उत्पादनक्षमताही मोठी असल्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होणे अपरिहार्य व आवश्यक बनते. त्याकरिता लागणारे मनुष्यबळही मोठे आणि विविध प्रकारचे असते. अधिकाधिक यंत्र-तंत्राच्या प्रवेशाने नगरातील लोकसंख्या अधिक व बहुविध बनत जाते.

solved 5
General Knowledge Friday 16th Dec 2022 : 13:36 ( 1 year ago) 5 Answer 9984 +22