गुंतवणूक का करावी?www.marathihelp.com

गुंतवणूक

गुंतवणूक म्हणजे स्वतःचे किंवा आपल्या व्यवस्थापनाचे जास्तीचे पैसे अधिक उत्पन्न मिळवण्याच्या उद्देशाने बँकेच्या स्वाधीन करणे वा दुसऱ्या व्यक्तीला किंवा कंपनीला त्याच्या उद्योगासाठी देणे.

या दुसऱ्या उद्योगाला होणाऱ्या नफ्याचा हिस्सा गुंतवणूकदाराला व्याजाच्या, लाभांशाच्या किंवा बोनसच्या रूपात मिळतो.

हा दुसरा उद्योग आपल्याच मालकीचा असावा असे नाही. गुंतवणुकीचा उद्देश अधिक उत्पन्न मिळवणे हा असला तरी केलेल्या गुंतवणुकीवर अधिक उत्पन्न मिळेलच असे नाही. जिथे गुंतवणूक केली त्या उद्योगाला फायदा झाला नाही तर आपली गुंतवणूक किमान काही काळासाठी व्यर्थ जाऊ शकते.
गुंतवणुकीचे प्रकार

१) कंपन्याचे भाग भांडवल

२) मुच्युअल फंडाचे वा युनिट ट्रस्टचे युनिट्स

३) बँकातील चालू वा बचत खाती किंवा मुदतीच्या ठेवी

४) पतपेढ्या, चिट फंड, क्रेडिट सोसायट्या यांतील ठेवी

५) भिशी योजना

६) शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या विमा योजना

७) पोस्ट खात्यातील विविध अल्पबचत योजना

८) राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना

९) प्रॉव्हिडंट फंड

१०) वैयक्तिक विमा योजना

११) सरकारने किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी बाजारात विक्रीसाठी आणलेले कर्जरोखे


म्युचुअल फंड

म्युचुअल फंड म्हणजे सहसा तज्ञ मंडळीकडून सांभाळल्या जाणाऱ्या अशा पैशांचा स्रोत जो की, एखाद्या गुंतवणूकदारांच्या समूहाकडून आलेला असतो. म्युचुअल फंडाचे प्रबंधक पुष्कळ गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करतात व तो विविध रोख्यांमधे जसे की, शेअर, रोखे बंध किंवा बाजारातील अन्य विकाल्पांमधे अथवा या सर्वांच्या मिश्र योजनेत गुंतवतात. यात फंडांचे गुंतवणुक उदिष्ट ठरलेले असते. संयुक्तरीत्या म्युचुअल फंडाकडून जो पैसा सांभाळला जातो त्यास सहसा खाते (पोर्टफ़ोलिओ) असे संबोधतात. प्रत्येक युनिटमध्ये गुंतवणूकदारांची समान मालकी असतेच, शिवाय जे उत्पन्न ही संपूर्ण रक्कम तयार करते त्यातही असते. म्युचुअल फंडांची त्यांच्या रचनेनुसार विभागणी होते. खुल्या योजना नेहमीच युनिटची विक्री व खरेदी करीत असतात. जेव्हा फंड विकतात तेव्हा गुंतवणूकदार खरेदी करतात आणि जेव्हा गुंतवणूकदार पैसा काढतात, तेव्हा हे फंड पुन्हा युनिटची खरेदी करतात. खरेदी किंवा पैसे काढणे हे सर्व एकूण मालमत्तेच्या किमतीवर आधारीत असते.

म्युचुअल फंडात गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचे विकेंद्रीकरण करू शकता. शिवाय जोखीम देखील थोडी कमी होते.

म्युचुअल फंडाची ठळक वैशिष्ठे :

तज्ञांकडून व्यवस्थापन- पैसा हा नेहमी त्या फंडाच्या प्रबंधकाकडून गुंतविला जातो.
विकेंद्रीकरण- विकेंद्रीकरण ही एक गुंतवणुकीची अशी युक्ती आहे ज्यामुळे संपूर्ण पैसा एकाच टोपलीत ठेवला जात नाही. जसे , सर्व अंडी एकाच पिशवीत असायला नकोतअसे म्हणतात !!
म्युचुअल फंडाच्या माध्यमातून शेअरची मालकी घेतल्यामुळे स्वतःचे शेअर किंवा रोखेपत्र यांच्यातील जी जोखीम असते ती विभागली जाते.
स्वस्त माध्यम- हे फंड एकाच वेळेस खूप शेअर्स विकत अथवा खरेदी करत असल्यामुळे जी काही व्यवहार किंमत असते, ती एखादया एकट्या व्यक्तीने केलेल्या व्यवहाराच्या तुलनेत अतिशय कमी येते .
रोख उपलब्धता- जशे शेअर, म्युचुअल फंडाचे युनिट विकून लागलीच रोख रक्कम प्राप्त होऊ शकते.
म्युचुअल फंडाचे युनिट घेणे सोपे आहे. पुष्कळ बँका त्यांचे स्वतःचे म्युचुअल फंड उपलब्ध करून देतात व गुंतविण्याची रक्कम देखील लहान असते.

गुंतवणूकदारांनी पैसा गुंतवण्यापूर्वी या सर्व बाबींचा नीट अभ्यास करूनच पैसे गुंतवायला हवेत.

म्युचुअल फंडांचे प्रकार :

प्रत्येक म्युचुअल फंडाचे गुंतवणुकीचे एक पुर्वनिश्चित असे उद्दिष्ट असते. ज्यात त्या फंडाचे पैसे कुठल्या प्रकारच्या प्रकारात व कशा योजनांनी गुंतविले जाणार हे ठरले असते. म्युचुअल फंडाचे खालील प्रकार आहेत.

खुले फंड( open ended ) : अशा फंडांची कोणतीही परिपक्वता तारीख नसते.
गुंतवणूकदार खुल्या फंडांचे युनिट खरेदी अथवा विक्री संपत्ति प्रबंधन करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयातून किंवा त्यांच्या गुंतवणूक सेवा केंद्रावरून किंवा शेअरबाजाराच्या माध्यमातून करू शकतात.
खरेदी किंवा विक्री मूल्य हे नेहमी म्युचुअल फंडाच्या एकूण मालमत्ता किंमतीवर आधारित असते.
ठराविक काळात बंद होणारे फंड ( close ended ): हे फंड विशिष्ट कालावधीसाठीच चालतात.
एका परिपक्वता तिथीला सर्व युनिटचे पैसे परत मिळतात व योजना बंद होते.
याचे युनिट शेअरबाजारात नोंदणी होतात. जेणे करून रोख रक्कम पुरविता येणे सोपे होते.
गुंतवणूकदार, याचे युनिट शेअर बाजारातील चढाव – उतारानुसार विकत घेऊ शकतात किंवा विकू शकतात.
रोखेबंध फंड (BOND FUND) : एक स्थिर उत्पन्न देण्याचा प्रयत्न या प्रकारात होतो.
गुंतवणूक ही सहसा शासकीय व वित्तीय ऋण पत्रात असते.
जरी फंडाची किंमत वाढली तरी, ह्याचे मुख्य उद्देश म्हणजे गुंतवणूकदारांना स्थिर पैसा पुरवणे हेच आहे.
समतोल फंड (BALANCED FUND) : सुरक्षा, उत्पन्न व भांडवलात वाढ असा समतोल या तिघांच्याही संयुक्ताने यात सांभाळता येतो. योजना हीच असते कि, निश्चित उत्पन्न देणारे विकल्प व शेअर्स यात संयुक्तपणे गुंतवणूक करणे.
रोखे/ शेअर : फंडगुंतवणूक ही शेअर व रोख्यांमधे असते.
म्युचुअल फंडाच्या मोठ्या भागाचे प्रतिनिधित्व करतो.
गुंतवणुकीचे मुख्य उद्देश दिर्घावधीत भांडवलाची वाढ व त्याच बरोबर उत्पन्नात देखील वाढ करणे.
विविध प्रकारचे शेअर फंड असतात कारण की, विविध प्रकारचे गुंतवणुक विकल्प उपलब्ध असतात.
वित्तीय बाजार फंड : अतिशय कमी कालावधीत निश्चित उत्पन्न देण्यात येणाऱ्या साधनांमधे गुंतवणूक केली जाते.
जरी फायदा खूप जास्त नसला, तरी मुद्दल सुरक्षित राहते.
हे बचत खत्यापेक्षा चांगला लाभ देतात. परंतु मुदत ठेविपेक्षा हा लाभ कमी असतो.


फसव्या योजना

या योजना मुख्यत्वे करून चुकीच्या मार्गाचा अवलंब करून राबवल्या जातात. ज्यात गुंतवणूकदाराला छोट्या जोखमीच्या मोबदल्यात मोठ्या पैशाचे आमिष दाखवले जाते. अशा योजना जुन्या म्हणण्यापेक्षा सर्वप्रथम जो गुंतवतो अशांसाठी, एकतर त्यांच्याच पैशातून अथवा त्यानंतर येणाऱ्या गुंतवणूकदारांकडून पैसा उभा करत असतात. जेव्हा की वास्तविक नफा काहीच कमविला जात नाही. या योजनांनी जाहिरातीत दाखविलेले फायदे, नफा हे केवळ या योजनांमधील पैसा सतत वाढत राहीला पाहिजे, जेणे करून योजना सुरू राहील याच केवळ उद्देशाने दाखविलेला असतो.

ही संपूर्ण प्रक्रिया जर गुंतवणूकदारांनी पैसे गुंतविले नाहीत, अथवा त्यांना वेळेवर पैसे दिले नाहीत तर मग ढासळते. सहसा अशा योजनांमधे गैरव्यवहार होण्याआधीच कायदेशीररीत्या कायद्याचे अधिकारी हस्तक्षेप करतात. कारण या योजनाच शंका घेण्यास वाव ठेवतात किंवा विनिमय संस्थांमधे नसलेल्या समभागांची विक्री यांच्या कंपनी विस्तार अधिकाऱ्यांकडून केली जाते. जितके लोक यात सहभागी होत जातात अधिकाऱ्यांची नजर अशा योजनांवर तितकीच करडी होत जाते.
अशा योजना कशा ओळखाव्यात?

या योजना सहसा, असे परतावे खात्रीशीर देणार जे बाजारात दुसऱ्या योजना देऊच शकत नाहीत. शिवाय अल्पावाधीचे परतावे हे अविश्वसनीयरीत्या जास्त किंवा अनाकलनीय प्रकारे स्थिर असतात, दुसऱ्या शब्दात अतिशय चांगले असतात की, ज्यावर विश्वासच बसत नाही.

मुलांसाठी गुंतवणूक करायचीय? उदय पिंगळे

एकीकडे महागाईत वाढ होत असतानाच शैक्षणिक खर्चांत वाढ होत आहे. त्यामुळे आपल्या पाल्याच्या भवितव्याविषयी अनेक पालक चिंतातूर असल्याचे दिसून आले आहे. मुलांच्या भवितव्यासाठी बाजारात अनेक योजना असल्याने अनेकांचा निवडीचा गोंधळ उडत आहे. या पार्श्वभूमीवर काही खात्रीशीर आणि चांगल्या योजनांचा घेतलेला आढावा...

...

सुरक्षितता, चांगला परतावा आणि रोकड सुलभता असणारी तसेच जोडीला करसवलतही देणारी योजना म्हणजे चांगली योजना असे समजले जाते. अनेक प्रकारच्या योजना सरकार, बँका, वित्तीय संस्था, विमा कंपन्या, म्युच्युअल फंडाच्या अॅसेट मॅनेजमेंट कंपन्या यांनी बाजारात आणल्या आहेत. दुर्दैवाने वरील सर्व अपेक्षा पूर्ण केल्या जातील अशी एकही योजना नाही. छोटे विभक्त कुटुंब, वाढती महागाई आणि शिक्षणावरील खर्चात दिवसेंदिवस होणारी वाढ यांमुळे अनेकांना मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने काहीतरी भरीव तरतूद आधीपासूनच करावी, असे कायम वाटते.

लोकांच्या या मानसिकतेचा विमा कंपन्या पुरेपूर फायदा घेत असून, मुलांच्या कल्याणासाठी म्हणून खास योजना त्यांनी बाजारात आणल्या आहेत. या योजना त्यांच्या दोन ते तीन योजनांची सरमिसळ असून, त्यातून मिळणारा परतावा सात टक्क्यांच्या आसपास आहे. योजना काळात विमाधारकाचे बरेवाईट झाल्यास करारात नमूद केलेले संरक्षण मिळते. म्हणून त्याला विमा योजना म्हणायचे एवढेच... तेव्हा अशा प्रकारच्या योजना या फारश्या आकर्षक नाहीत. माहीत असलेले मोजके पर्याय, एजंटचे नेटवर्क आणि त्यांनी केलेले भावनिक आवाहन यामुळे गुंतवणूकदार अशा योजना खरेदी करीत आहेत. त्यामुळे कोणती योजना अधिक चांगली, याबाबत इतरांच्या मनात गोंधळाची स्थिती निर्माण झाली असून, अनेक पालक संभ्रमात आहेत. केवळ मुलींसाठी असलेली सुकन्या समृद्धी योजना ही एकमेव सरकारी योजना असून सध्या त्यावर वार्षिक ८.५ टक्के दराने व्याज मिळते. ही योजना फक्त १० वर्षांखालील मुलींसाठी असल्याचे तसेच यातील रक्कम फक्त मुलीला मिळत असल्याने त्याचा फायदा मर्यादित लोकच घेऊ शकतात.

मुलांसाठी गुंतवणूक कशासाठी?

- उच्च शिक्षणाचा खर्च : शिक्षण दिवसेंदिवस महाग होत आहे. कर्जाच्या सोयी उपलब्ध असल्या, तरी सर्वांचा कल हा काहीही करून शिक्षणास पैसे कमी पडू नयेत असा असतो. अधिक महागडे शिक्षण म्हणजे अधिक चांगले शिक्षण असा सर्वसाधारण कल आहे.

- लग्न : लग्न समारंभ अविस्मरणीय व्हावा अशी अनेकांची इच्छा असते. विविध मालिका, चित्रपट यातील भव्यदिव्य लग्नसमारंभ पाहून सर्वांना असा खर्च केला पाहिजे असे वाटत आहे. त्यामुळे यावर चढाओढीने अधिकाधिक खर्च केला जात आहे.

- घर घेण्यासाठी अंशतः मदत : घरांच्या वाढत्या किमतीमुळे नव्याने विकसित होत असलेल्या शहरातही घर घेणे परवडत नाही. जरी घर घेण्यासाठी कर्जाची सोय उपलब्ध असली, तरी त्यातील किमान गरजेच्या गोष्टी घेण्यासही बरीच रक्कम लागते. यासाठी काही मदत व्हावी असा यामागील हेतू आहे.

- व्यवसायासाठी भांडवल : मुलांनी काही व्यवसाय करायचा ठरवल्यास त्यासाठी लागणाऱ्या संभाव्य भांडवलाची गरज यातून भागवली जाईल असे पालकांना वाटते.

सर्वसाधारणपणे पालक गुंतवणूक करताना वरील गोष्टींचा प्रामुख्याने विचार करतात. त्यापूर्वी पालकांनी स्वतःचा पुरेसा मुदत विमा (वार्षिक उत्पन्नाच्या २०पट) आणि आरोग्य विमा (वार्षिक उत्पन्नाच्या २ ते ३ पट) काढणे आवश्यक आहे. जीवन विमा योजनेतून आपल्याला काय मिळेल, यापेक्षा आपल्या अनुपस्थितीत आपले कुटुंब, सध्याचा जीवनस्तर कसा सांभाळू शकेल? हे महत्त्वाचे आहे. यानंतरच उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांचा मुलांसाठी ठरवलेल्या वरील उद्दिष्टांसाठी कसा वापर करता येईल ते पाहुया...

- सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) : सोळा आर्थिक वर्षांसाठी हे खाते पोस्टात किंवा बँकेत काढता येते. ते स्वतःच्या किंवा अज्ञान पाल्याच्या नावे काढता येईल. यात वार्षिक किमान ₹५०० रुपयांपासून ते दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. हे पैसे सरकार वापरात असल्याने १०० टक्के सुरक्षित आहेत. यातील गुंतवणुकीवर आठ टक्के करमुक्त व्याज मिळते. शिवाय यावर प्राप्तिकर अधिनियम ८० सी खाली करसवलत मिळत असली, तरी ती सवलत अन्य गुंतवणुकीतून घेऊन अधिकाधिक रक्कम या योजनेत जमा करावी. सातव्या आर्थिक वर्षापासून दरवर्षी एकदा कोणत्याही कारणासाठी अंशतः रक्कम काढता येत असल्याने गरजेनुसार त्याचा आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी वापर करता येईल. या खात्याची मुदत पूर्ण झाली, तरी आपल्या इच्छेनुसार पाच वर्षे वाढवून घेता येते.

- म्युच्युअल फंडांच्या योजना : अशा योजना व्यक्ती किंवा त्यांची मुले यांच्यासाठी असल्या, तरी त्यात फार काही फरक नसतो. म्हणून आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी अशी गुंतवणूक करणार असाल तर त्यासाठी आपल्या नावावर वेगळा पोर्टफोलिओ निर्माण करून त्यात 'एसआयपी'च्या माध्यमातून नियमित गुंतवणूक करावी. इक्विटी योजनांतून दीर्घकाळात चांगला परतावा मिळू शकतो. करसवलत घ्यायची असल्यास 'ईएलएसएस'चा विचार करावा. सहज उपलब्ध आहे म्हणून त्याच्या निव्वळ मालमत्ता मूल्याचा फारसा विचार करू नये. आपल्याला पैशांची अंदाजे कधी गरज लागू शकेल त्याच्या दोन ते तीन वर्षे आधी योजनेतून मिळत असलेला परतावा पाहून, तो आपणास अपेक्षित किंवा असाधारण असेल तर 'एसआयपी' खंडित न करता पूर्ण रक्कम काढून लिक्विड फंडात वळवावी. याचा उपयोग आपल्या खऱ्याखुऱ्या गरजेनुसार करता येईल आणि बाजारातील अनिश्चतीचा त्यावर परिमाण होणार नाही. दहा वर्षांहून अधिक काळ सातत्याने गुंतवणूक करीत राहिल्यास चक्रवाढ व्याजाने किमान १५ टक्के परतावा मिळायला हरकत नाही. योजनेची निवड करण्यात काही अडचण वाटत असल्यास व्यावसायिक सल्लागाराची मदत घ्यावी.

- शेअर्समध्ये थेट गुंतवणूक : म्युच्युअल फंडाचे फंड मॅनेजर युनिट होल्डरच्यावतीने जे काम करतात, ते आपणच करावे आणि अधिक फायदा मिळवावा... हे थोडे कौशल्याचे काम असले तरी अशक्य नाही. थोडे जागृत राहून आपल्या गुंतवणुकीवर उच्च परतावा मिळवणे शक्य आहे. यासाठी 'डी मॅट' खाते उघडून यातील गुंतवणूक नियमित गुंतवणूकीपासून वेगळी ठेवावी. कॉफी कॅन पोर्टफोलिओ (CCP) हे एक गुंतवणूक तंत्र असून, त्याच्या मदतीने गेल्या दहा वर्षांत सर्वोत्तम परतावा देणाऱ्या आणि नियमितता राखणाऱ्या कंपन्या आपणास समजल्या तर आपल्या ऐपतीप्रमाणे यात गुंतवणूक करता येईल. समभागांच्या भावात पडणाऱ्या मोठ्या फरकापासून आपली गुंतवणूक सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या गरजेपूर्वी दोन ते चार वर्षे आधी आधी त्यातील गुंतवणूक पूर्णपणे काढून घेऊन लिक्विड किंवा डेट फंडात गुंतवावी.

वर सुचवलेल्या योजना चढत्या क्रमाने धोकादायक परंतु, अधिक परतावा देणाऱ्या आहेत. त्यामुळे आपल्या जोखीम घेण्याच्या तयारीनुसार त्यांचे एकत्रीकरण करून टक्केवारी निश्चित करता येईल. त्यामुळे आपल्या मुलांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुखकर आणि सुरक्षित करता येऊ शकेल.

solved 5
General Knowledge Monday 12th Dec 2022 : 11:48 ( 1 year ago) 5 Answer 7757 +22